जसराज जोशी – list

तो चिरतरुण आवाज म्हणजे माझ्या मते, भारताच्या संगीत इतिहासातील सर्वात अष्टपैलू गायिका.. सर्वात जास्त गाणी गाणारी गायिका असा विक्रमही या संगीत सम्राज्ञीच्या नावावर आहे.. नाव अर्थातच आशा भोसले. ८ सप्टेंबरला आपल्या आशाताईंचा ८२वा वाढदिवस झाला. आशाताईंनी तब्बल १२ हजारपेक्षाही जास्त गाणी गायली आहेत म्हणे आजवर! अर्थात ही सगळीच्या सगळी गाणी कुठल्या एका प्ले लिस्टमध्ये बसणे अशक्यच आहे, म्हणून आज सादर करत आहे आशाताईंच्या गायकीतील मला दिसलेले बारा रंग, बारा रस, बारा सूर.
सुरुवातीला अर्थातच कुठल्याही पिढीमधल्या कुणाही तरुणाला वेड लावणारा आशाताईंचा ट्रेडमार्क असलेले चार रंग..
१ – कॅबरे गाणी. काहीशी गीता दत्त यांच्या गायकीतून प्रेरणा घेऊन, पण त्यात स्वत:चा बाज टाकून, त्यात पाश्चात्त्य गायकीचा सुंदर वापर करून बनवण्यात आलेली ही अफलातून गायकी. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दुनिया में लोगो को’, ‘हुस्न के लाखो रंग’, ‘आज की रात’ इत्यादी.. चित्रपटामध्ये खास आशाताईंसाठीच सिच्युएशन तयार करून ही गाणी घातली जायची, एवढे या गाण्यांचे सर्वत्र वेड होते.
२ – जसे हिंदीमध्ये कॅबरे, तशीच मराठीमध्ये लावणी. ‘या रावजी बसा भावजी’ हे आशाबाईंच्या आवाजात ऐकले की अंगावर एक वेगळाच शहारा येतो. वेगळीच ओढ निर्माण होते. ‘रेशमाच्या रेघांनी’चीसुद्धा तीच गत.
३ – तरुणाईला वेड लावणारा अजून एक रंग, रस म्हणजे आवाहन करणाऱ्या या गाण्यांचा.. ‘ये है रेशमीझुल्फो का अंधेरा..’, ‘आओ हुजुर तुम को’, ‘अब जो मिले है तो’, ‘आओ ना गले लागाओ ना..’, ‘रात अकेली है’पासून मराठीमधल्या ‘मलमली तारुण्य माझे’, ‘रुपेरी वाळूत’, ‘शारद सुंदपर्यंत..’ आवाहन करणारा, आपल्याकडे बोलावणारा आशाचा आवाज. वेड लागणार नाही तर काय? परत या रंगातल्या वेगवेगळ्या गाण्यांमधे छटासुद्धा किती.. कधी सौम्य, कधी आक्रमक, कामुक तर कधी अगदी शुद्ध सात्त्विक!
४ – अशा या शृंगारिक आवाजाने परत परत बोलावावे म्हणून आपल्याला परत परत रुसावेसे वाटणारच ना! मग ‘ओ मेरे सोना रे’ किंवा ‘अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना’, ‘तू रूठा तो मैं रो दुंगी सनम, ‘ये लडका हाय अल्लाह’, ‘जाइये आप कहा जाएंगे’ वगैरे ऐकत ऐकत परत प्रेमात पडायचे. हाऊ रोमँटिक!
५ – राहुल अँड आशा. या जोडीने केवढी अजरामर गाणी दिली आहेत. विशेष करून गुलजारच्या साथीने. ‘दिल पडोसी है’मधली वेगळ्या वळणावरची गाणी, ‘मेरा कुछ सामान’, ‘रोज रोज डाली डाली’, ‘खाली हाथ शाम’, ‘दो नैना इक कहानी’ विषय कट.
६ – सोलो गाणी. मराठीमधली ‘घनरानी साजणा’, ‘सांज ये गोकुळी’, ‘ऋतू हिरवा’, ‘उषकाल होता होता’ ही वेगवेगळ्या भावाची मराठी गाणी. ‘जब चली ठंडी हवा’ ते ‘तनहा तनहा’, ‘याई रे याई रे’सारखी ‘रंगीला’मधली गाणी.. हा पण असा रंग आहे, ज्याच्या अनेक छटा आहेत.
७ – युगूल गीत. यामध्ये आशाताईंचा हात कोणीच धरू शकत नाही. रफीसाहेबांच्या गोड गळ्याबरोबर गाताना आशाताईंचा आवाज एक्स्ट्रा गोड होताना दिसतो. म्हणूनच ‘इशारो इशारो में’, ‘दीवाना हुवा बादल’, ‘अभी ना जाओ छोड कर’सारख्या क्लासिक्सपासून ‘ओ हसीना झुल्फोवाली’, ‘आजा आजा’सारख्या नटखट गाण्यांपर्यंत या सगळ्याच युगूल गीतांची गोडी कधीच कमी होत नाही.
८- किशोर कुमारबरोबरची आशाताईंची केमिस्ट्री तर फारच भन्नाट, केवढी व्‍‌र्हसटाइल! ‘छोड दो आंचल’, ‘पांच रुपैया बारा आना’, ‘आँखो में क्या जी..’ ही ब्लॅक अँड व्हाइट गाणी कुठे आणि ‘वादा करो नही छोडोगे तुम मेरा साथ’, ‘नही नही अभी नही’, ‘हवा के साथ साथ’सारखी मॉडर्न गाणी कुठे!
९. गजल – ‘उमराव जान’मधली सगळीच गाणी, त्यातही ‘इन आँखो की मस्ती के’, ‘ये क्या जगह है दोस्तो’, किंवा ‘मिराझ ए गजल’ या गुलाम अली साहेबांबरोबरच्या आल्बममधली ‘सलोना सा साजन है’, ‘करू ना याद मगर’, ‘अजीब मानस अजम्नबी था’, ‘दिल धडकने का सबब’ तसेच उल्लेख करावाच लागेल अशी ‘ऋतू हिरवा’मधली ‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले..’ हे गाणे फारच आवडते.
१०. नाटय़गीत – गजलचा जेवढा अभ्यास, जेवढी तयारी तेवढीच तयारी तेवढाच अभ्यास नाटय़ागीते गातानासुद्धा! ‘युवती मना’, ‘शुरा मी वंदिले’.. काय तयारी आहे! काय काय प्रकारचा रियाझ केला असेल यांनी?
११. भक्तिगीते – याला म्हणतात हरहुन्नरी. आशाताईंच्या आवाजातली लावणी आपल्याला जेवढी आवडते, तेवढीच त्यांनी गायलेली ‘ये गं ये गं विठाबाई’, आणि ‘जय शारदे वागीश्वरी’ ही भक्तिगीतेसुद्धा आवडतात.
१२. लोकगीते – आशाताई जेव्हा लोकरंगात रंगतात, तेव्हा त्या मराठी किंवा कुठल्या एका भाषेच्या, मातीच्या राहातच नाहीत.. त्या त्या मातीतल्या होऊन गातात. म्हणजे ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’, ‘उडे जब जब जुल्फें तेरी’, ‘झुमका गिरा रे’, ‘राधा कैसे ना जले’ ही गाणी ऐकताना असे वाटते, की कोणी तरी उत्तर भारतीय गायिका ही गाणी गात आहे. हेच ताईंचे यश आहे.
या खेपेलासुद्धा मी बाळासाहेब-आशा हे कॉम्बिनेशन या प्ले लिस्टमध्ये उल्लेखणे टाळले आहे. ते प्रकरणच वेगळे आहे ना! पुढे कधी तरी येईलच ते.
हे ऐकाच.. आशाताई आणि गुलाम अली
मिराझ ए गजलनंतर सुमारे तीस एक वर्षांनी – २००८ मध्ये आशाताई आणि गुलाम अली खानसाहेबांचा अजून एक आल्बम आला – जनरेशन्स या नावाचा. अर्थात याला ‘मिराझ ए गजल’ची सर नक्कीच नाही, पण खूप वर्षांनी जुळून आलेला हा योग अनुभवावा असाच आहे. तेव्हा दोघांचाही आवाज, दोघांची गायकी ही प्रौढ, तयारीची अशी होती. आज ती पोक्त, बुजुर्ग, उस्ताद श्रेणीमध्ये मोडेल अशी वाटते. तुम्ही ‘मिराझ ए गजल’चे फॅन असाल, (नसाल तर मिराझ ए गजल ऐका आधी) तर हा ‘जनरेशन्स’सुद्धा तुम्हाला आवडेल. चुकवू नका.

===========================================

२७ जानेवारी. जागतिक मराठी दिन. यानिमित्ताने माझ्या लहानपणी माझ्यावर सांगीतिक संस्कार करणाऱ्या मराठी कलाकारांची प्लेलिस्ट..
लहानपणी मी सर्वात जास्त कोणाची गाणी ऐकली, बसविली असतील, तर ती बाबूजी म्हणजेच सुधीर फडके आणि अण्णा म्हणजेच भीमसेन जोशी यांची. स्वत: बाबूजी, राम फाटक, प्रभाकर जोग, यशवंत देव या संगीतकारांची बाबूजींनी गायलेली भावगीते उदाहरणार्थ- ‘दिसलीस तू फुलले ऋतू’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको’, ‘प्रिया आज माझी नसे साथ द्याया’, ‘सखी मंद झाल्या तारका’ अशी गाणी सतत माझ्या कानांमध्ये आणि जिभेवर तयार असायची. तीच गोष्ट अण्णांच्या अभंगवाणीबाबत. भीमसेनी थाटातील ते ‘तीर्थ विठ्ठ्ल क्षेत्र विठ्ठ्ल’, ‘पंढरी निवासा सख्या पांडुरंगा’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘याजसाठी केला होता अट्टहास’, ‘मन रामरंगी रंगले’, ‘इंद्रायणी काठी’ आजही कानात रुंजी घालत राहतात.
लहानपणी ही गाणी भरपूर ऐकल्यामुळेच बाबूजी आणि अण्णा यांचा माझ्या गायकीवर आपोआपच खूप प्रभाव पडलेला आहे; त्याचबरोबर वेगळा विचार करायची इच्छा जागृत झाली; ती अभिषेकी बुवांमुळे! पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांच्या शिष्यांनी त्यांच्या रचनांचा एक कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमाच्या रेकॉìडगची कॅसेट मला माझ्या आजोबांनी तेव्हा आणून दिली होती. ती ऐकून माझा नाटय़गीत या प्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. खासकरून त्या कॅसेटमध्ये शौनक अभिषेकी यांनी गायलेल्या ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ (नाटक : ययाती-देवयानी)चा तर मी फॅनच झालो! तसेच ‘रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी..’ आणि ‘कशी तुज समजावू सांग’ ही भावगीते ऐकून भावगीत या शब्दाची माझ्या मनातली व्याख्याच बदलून गेली! ‘छेडून गेले मधुर स्वर विमल’ (नाटक-कधी तरी कुठे तरी); तुझ्या अंगसंगाने..’(नाटक : मीरा मधुरा) ‘कधी भेटेंन वनवासी वियोगी रामचंद्राला’ (धाडीला राम तिने का वनी) हे वेगळ्याच आर्त, आद्र्र भावाचे नाटय़गीत, ‘महानंदा’ मधील ठुमरीवजा गाणं- ‘तुझीया गे चरणीचा झालो मृगनयनी दास’ अशीच गुंतवून ठेवणारी गाणी. ‘मत्स्यगंधा’मधील ‘गुंतता हृदय हे’ तुम्ही ऐकलं असेल. ‘या इथे जाहला संगम दो सरितांचा’ या कडव्यात दोन नद्यांचा संगम म्हणून प्रतीकात्मकरीत्या दोन निषादांचा कल्पक वापर केला आहे.. अफलातून. शेवटी अर्थातच ‘ययाति आणि देवयानी’ मधले ‘सर्वात्मका सर्वेश्वरा..’ त्या एका कॅसेटमुळे माझी विचार-प्रक्रियाच बदलून गेली!
असेच काहीसे परत झाले ते श्रीधर फडके यांची गाणी ऐकून! गाणी रेकॉर्ड आणि अरेंज करताना सुश्राव्य ध्वनीचाही गंभीररीत्या विचार करण्याचा काळ आणि तसे तंत्रज्ञान तेव्हा हळूहळू विकसित व्हायला लागले होते आणि तशात ‘तेजोमय नादब्रह्म’ या अल्बमने माझे अक्षरश: कान उघडले! सुरेश वाडकर आणि आरती अंकलीकर यांच्या काहीशा अनवट मिश्रणातून साकारलेला अल्बम – ‘मी राधिका’, ‘मी एक तुला फूल दिले’, ‘कधी रिमझिम’, ‘दे साद दे हृदया’ इत्यादी गाण्यांमध्ये चाल आणि गायकीचे सौंदर्य वादातीत आहे.
मला आठवतेय, त्या काळात ‘संतवाणी’ या सदराखाली संध्याकाळी साधारण दुपारी ४ वाजता दूरदर्शन सहय़ाद्रीवर दररोज दोन-तीन मिनिटे भक्तिगीते ऐकवली जायची. उतरत्या उन्हाचा खिडकीतून येणारा कवडसा आणि श्रीधर फडके यांची ‘येई वो विठ्ठ्ले..’, ‘आम्हां न कळे ध्यान.’, ‘देवाचिये द्वारी, उभा क्षण भरी..’ ‘विठ्ठल आवडी प्रेमभावो’.. घरातील त्या वेळचं दृश्य आठवून आत्तासुद्धा अंगावर काटा आला.
श्रीधर फडके यांच्या ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’, आणि संपूर्ण ‘ऋतू हिरवा’ हा आल्बम, यांचा फक्त उल्लेखच पुरेसा आहे.. ती तुम्ही ऐकलीच असणार.

हे ऐकाच..
अमृतगाथा आणि लोकगीते
चंद्रकांत काळे हे नाव त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे, आणि स्वच्छ वाणीमुळे तुमच्या नक्कीच परिचयाचे असेल, मला त्यांचा परिचय झाला, तो त्यांच्या प्रयोगशील गायकीतून! अर्थात चंद्रकांत काळेंच्या चाहत्यांसाठी त्यांनी गायलेली गाणी हा काही नवीन भाग नाही, पण मी पहिल्यांदा त्यांना ऐकले, ‘अमृतगाथा’ या अल्बममधून. भक्तिसंगीताची, किंबहुना भक्तीची एक नवी मितीच माझ्या डोळ्यांसमोर आली! अमृतगाथा हे स्व. आनंद मोडक, माधुरीताई पुरंदरे आणि चंद्रकांत काळे यांनी एकत्र येऊन केलेले सादरीकरण फारच वेगळे आणि प्रयोगशील आहे. सर्वच संतसाहित्याला चाल लावताना आणि त्या चाली सादर करताना पठडीबाहेरचा विचार केला आहे. विशेषत: ‘राजस सुकुमार’ हा तुकारामांचा अभंग.. मस्तच! तसेच ‘हमाम्मा रे पोरा’, ‘गवळणी ठकविल्या’, ‘आम्ही लटिके ना बोलू’, ‘जळे माझी काया’.. सर्वच गाणी आवर्जून ऐकण्यासारखीच! त्याचप्रमाणे कै. केशवराव बडगे यांची लोकगीतेही माझ्यासारख्या गायकावर वेगळे संस्कार करून गेली. लोकगीतांच्या परंपरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त करून देणाऱ्या केशवराव बडगे यांची- ‘खेळे भवरा गं बाई भवरा.’, ‘पोरी हळू चाल जोडवं टचकंल..’, ‘बिकट वाट वहिवाट नसावी..’ आणि तौफिक कुरेशी यांच्याबरोबर गायलेले सुप्रसिद्ध ‘जी जी रे’ ही गाणी ऐकली नसतील तर नक्की ऐकावी अशीच!

============================

४ फेब्रुवारी.. भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींचा म्हणजे आपल्या अण्णांचा ९३ वा जन्मदिवस. अण्णा हे नाव उच्चारताच माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो एखादा मोठा धबधबा किंवा धो धो कोसळणारा पाऊस. अण्णांचं गायन चालू असताना आपल्याला काहीच करावं लागत नाही.. बस्स डोळे मिटून त्या गाण्यापाशी आत्मसमर्पण करायचं! बाकी सगळं अण्णा करतात. आपल्याला चिंब भिजवतात, आपल्यावर धो धो कोसळतात, आपलं स्थल-काल-मितीचं भान हिरावून घेतात. ‘बाबुल मोरा’ किंवा ‘जो भजे हरि को सदा’ पूर्ण होऊन संपेपर्यंत आपण शुद्धीवरच नसतो येत.
भरदार आवाजाचा समानार्थी शब्द म्हणजे अण्णा. किती प्रचंड मेहनत आहे या आवाजामागे! नुसती आवाजाचीच नाही, तर अंगमेहनतसुद्धा! त्यांचा तो कमावलेला खर्ज, एक एक सूर प्रस्थापित करीत खुलत जाणारा रागविस्तार.. स्थिरता आणि चंचलतेचा अनोखा संगम. त्या श्रोत्यांना दमछाक करायला लावणाऱ्या एका श्वासातल्या लांब लांब ताना.. स्वत:च्या गळ्यावर इतका अधिकार गाजवणारा कलाकार पुन्हा होणं शक्यच नाही.
‘अण्णा’ प्ले लिस्टविषयी बोलायचं झालं तर एक प्ले लिस्ट एकटय़ा यमन रागाची करावी लागेल. इतकं अण्णांनी ‘यमन’वर आणि ‘यमन’ने अण्णांवर प्रेम केलं आहे. ‘एरी आली पियाबीन’ ही तीन-तालातली बंदिश तर प्रत्येक रेकॉìडगमध्ये वेगवेगळ्या लयीत आणि वेगवेगळ्या मूडमध्ये ऐकू येते.
यमनव्यतिरिक्त माझ्या फोन/ आयपॉडवर कायमचे असणारे अण्णांनी गायलेले राग म्हणजे – वृंदावनी सारंग, गौड सारंग. मधली एक दोन वर्षे तर मी रोज रात्री फक्त हीच कॅसेट ऐकायचो- एका साइडला वृंदावनी सारंगमधील ‘तुम रब तुम साहेब’(झपताल) आणि ‘जाऊ मैं तोपे बलिहारी’(तीन-ताल)
तर दुसरीकडे गौड सारंगमधील ‘सया मनू दतडी’(एकताल) आणि ‘वेया नजर नहीं आवौन्दा वे’ (तीन-ताल). शिवाय मिया की तोडी, मिया-मल्हार, पूरिया धनाश्री, दरबारी कानडा, कौसी कानडासारखे भरजरी राग, दुर्गा, तिलक कामोद, शुद्ध सारंग, बसंतसारखे छोटे राग, हे घरी सतत लावल्या जाणाऱ्या रागांपकी.
भीमसेनजींना गावागावांतल्या, खेडय़ा-पाडय़ातल्या प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत बनवणारे अभंग ऐकत ऐकत, ते बसवत बसवत मी लहानाचा मोठा झालोय. पकी ‘राम रंगी रंगले’ आणि ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ हे अभंग मला वेगळीच धुंदी देतात. ‘कान्होबा’, ‘पंढरी निवासा’मधील आर्जव आपल्याला हळवे करून जाते, ‘याचसाठी केला होता अट्टहास’, ‘इंद्रायणी काठी’ ऐकताना या दोन महान संतांना निरोप देताना अण्णा खरोखरच तिथे उपस्थित आहेत, असा भास निर्माण होतो. विठ्ठलाऽऽऽ मायबापाऽऽऽच्या वेळी मन गहिवरल्याशिवाय राहत नाही. माझी खात्री आहे, आज हे तिघे तिकडे वरती रोज मैफिली रंगवत असतील.. आणि भीमसेनी आवाजात आपले अभंग ऐकून तुका आकाशा एवढा होत असेल आणि ज्ञानोबा म्हणत असेल, ‘ऐसा म्या देखिला निराकार वो माये..’

===========================

भारतीय गज़्‍ाल विश्वातील शिरोमणी जगजीत सिंह यांचा जन्मदिवस..
८ फेब्रुवारी (१९४१). गज़्‍ाल गायकीत बेगम अख्तर, मेहंदी हसन, गुलाम अली असे प्रस्थापित प्रवाह असताना स्वतचा वेगळा असा प्रवाह आणि प्रेक्षक वर्ग निर्माण करणाऱ्या जगजीत सिंह यांनी गज़्‍ाल आणि उर्दू भाषेला देश आणि धर्मापलीकडे नेऊन ठेवले. खर्जदार आवाज, गायकीतील सहजता आणि श्रोत्यांच्या कानामाग्रे थेट हृदयापर्यंत जाणाऱ्या चालींच्या जोरावर जगजीतसाहेबांनी गज़्‍ालला भारताच्या घराघरांत पोहोचवले; अनेक गज़्‍ाल प्रेमी घडवले. ज्या काळात गज़्‍ाल ही फक्त हार्मोनियम, तबला, सारंगीसह मफलीत गायली जायची, त्या काळात जगजीतसाहेबांनी गज़्‍ाल वर वगवेगळे प्रयोग केले, संगीत संयोजनावरही विशेष भर दिला आणि ग़ज़्‍ालला व्यावसायिकदृष्टय़ा अजून परिपक्व केले. ती मफलीपुरती मर्यादित ना राहता चित्रपट आणि कॅसेट विश्वातही विस्तारती झाली. गज़्‍ाल तरुणवर्गात प्रसिद्ध झाली त्यामागे जगजीतजींचा खूप मोठा हात आहे. ‘तुम इतना जो मुस्कुरा रहें हो’.., ‘प्यार मुझसे जो किया तूने.’, ‘होठोसे छू लो तुम..’ आजही तरुणांकडून गिटार वर गायल्या-गुणगुणल्या जातात. ही गाणी मीसुद्धा वरचे वर ऐकत असतोच किंवा यू टय़ूबवर विविध मफलीत गायकीत ‘सरकती जाए है रुख से नक़ाब..’ किवा ललित रागातील आणि अनवट अशा (१० मात्रांच्या) ठेक्यातील ‘कोई पास आया सावेरे सावेरे..’ नेहमी पाहात असतो.
पण मला त्याहीपेक्षा आवडतात ती ‘सजदा’ मधील सगळी गाणी. जगजीत सिंह आणि लतादीदी यांचा सुरेल संगम असलेल्या ‘सजदा’-५’.1 आणि ५’.2 वर माझे नितांत प्रेम आहे! का कोण जाणे; ‘सजदा’ ऐकत असताना माझ्या डोळ्यासमोर नुकतीच दिवे लागणी झालेल्या शहराचा देखावा उभा राहतो! म्हणजे आपण कुठेतरी टेकडीवर किवा उंच गच्चीवर आहोत, मस्त वारा आहे, समोर शहरभर माणसाचे अस्तित्व सिद्ध करणारे सिटीलाइट्स आहेत, रस्त्यांवरून दिवे धावतायत.. लोक आपापल्या घरी परतत आहेत, आणि हे दोघे गातायत-
‘हर तरफ हर जगह बेशूमार आदमी
फिर भी तन्हाइयोंका शिकार आदमी’
एकूणच, एकटेपणाला केंद्रस्थानी ठेवून या अल्बममधील गज़्‍ालांची (काव्याची) निवड केली गेलेली दिसते. कदाचित दिवसभर काम करून थकलेल्या माणसाला संध्याकाळी जो एकटेपणा मिळतो, विशेष करून घरी परतत असताना.. कधी हवाहवासा वाटणारा तर कधी त्रास देणारा, त्या स्थितीसाठी किवा त्या स्थितीत ही गाणी बनली असावीत..
‘मौसम को इशारेसे बुला क्यूँ नहीं लेते’
‘कभी यूँ भी आ मेरी आँख मे, के मेरी नज़्‍ार को खबर ना हो..’
‘धुआ बनाके फ़िज़ा मे उडम दिया मुझको..’
‘ग़म का ख़ज़ाना तेरा भी है मेरा भी..’
‘दिल ही तो है, ना संग-ओ-खिश्त, दर्द से भर न आए क्यूँ?’
‘दर्द से मेरा दामन भर दे या अल्लाह..’
ऐकताना तुम्हालाही अशीच संध्याकाळ आठवल्याशिवाय राहणार नाही. सगळ्याच चाली एक से एक.. आणि १९९१ चा विचार करता संगीत संयोजनात कमालीचे नावीन्य! ‘सजदा’ ही खरोखरच अजरामर कलाकृती आहे!

हे ऐकाच..
तेरा बयाँ ग़ालिब
‘सजदा’ मधील ‘दिल ही तो है ना सांग-ओ-खिश्त’ ही गज़्‍ाल खरे तर जगजीत साहेबांनी ‘मिज़्‍रा ग़ालिब’ या गुलजार साहेबांच्या सीरियलच्या वेळी संगीतबद्ध केलेली आहे. १९८८ मध्ये आलेली ही सीरियल आजच्या आम्हा तरुणांनी पहिली असण्याची शक्यता तशी पुसटच आहे; मला पण माझ्या एका नसिरुद्दीन शहाला देव मानणाऱ्या आणि अख्खा गालिब पाठ असणाऱ्या नचिकेत देवस्थळी या मित्रामुळेच ती पाहण्याची बुद्धी झाली. खरंच, आज आपण ‘सीरियल’ च्या नावाखाली काय पाहात असतो टीव्हीवर.. असो. या सीरियलसाठी जगजीतसाहेबांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या ग़ालिबच्या गज़्‍ाला अवर्णनीय आहेत. त्या काळातील मुशायऱ्यांमध्य गज़्‍ाल ज्या पद्धतीने म्हटली / सादर केली जात असेल, त्याचा आणि सुमधुर चाली रचणाऱ्या आपल्या प्रतिभेचा सुरेख समतोल जगजीतसाहेबांनी यात साधला आहे आणि जणू ग़ालिबचा काळच आपल्यासमोर उभा केलाय!
या सीरियलची डीव्हीडी तर बाजारात उपलब्ध आहेच, पण मला नव्यानेच कळलेय की, मिर्जा ग़ालिब सीरियलमधील जगजीत आणि चित्रा सिंह यांनी गायलेल्या गज़्‍ाला आणि ग़ालिबने लिहिलेली पत्रे खुद्द गुलझार साहेबांच्या खास शैलीदार आवाजात रेकॉर्ड केलेला असा.. हे भन्नाट कॉम्बिनेशन असलेला ‘तेरा बयाँग़ालिब’ हा आल्बमही बाजारात उपलब्ध आहे..तुम्ही जर गज़्‍ाल प्रेमी असाल तर हे दोन अल्बम चुकवून चालणारच नाहीत..!

=====================================

मखमली गळ्याचे गायक पद्मश्री हरिहरन यांचा आज ५९ वा वाढदिवस. गायकीच्या एका पद्धतीत खासियत असूनही दुसऱ्याही पद्धातींमधे तेवढाच ठसा उमटवणाऱ्या, सरगम आणि तीनही सप्तकांवर प्रभुत्व गाजवणाऱ्या, कुठल्याही गाण्याला स्पर्श करताच त्या गाण्याचे सोने करून टाकणाऱ्या हरिहरन यांचा फॅन कोण नाही? सादर आहे त्यांच्या वेड लावणाऱ्या गाण्यांची प्लेलिस्ट-
परत एकदा सर्वात जास्त गाणी ‘एआरआर’ बरोबरचीच. दोघेही मूळ तमिळ असल्याने रेहमान-हरिहरन जोडी हिट नसती झाली तरच नवल! (दर वेळी प्लेलिस्टमध्ये एक तरी एआरआरचे गाणे असतेच, असं तुम्ही म्हणाल, त्याआधीच सांगतो.. पुढच्या वेळी रेहमान चे नावही काढणार नाही..शप्पथ!)
रेहमाननीच हाय रामा(रंगीला), सून री सखी (हमसे है मुकाबला), भारत हमको जानसे प्यारा है (रोजा) या गाण्यांतून शास्त्रीय-उपाशास्त्रीय धाटणीचा गायक अशी हरिहरन यांची प्रतिमा निर्माण केली आणि ‘टेलिफोन धून मे हसने वाली’ (िहदुस्थानी), यू ही चलाचल (स्वदेस) सारख्या उडत्या चालीच्या गाण्यांनी ती धुऊन काढली. रेहमान-हरिहरन जोडीने दिलेली सर्वात सुंदर गाणी विरहगीत या प्रकारात मोडतात. रोजा जानेमन (रोजा), तू ही रे.. (बॉम्बे), चंदा रे चंदा रे (सपने) आणि कहर म्हणजे माझ्या सर्वात आवडत्या मोजक्या गाण्यांपकी एक- प्रेयसी(ताल) या गाण्यांत हरिहरन यांचा एक वेगळाच टोन लागला आहे.. डायरेक्ट काळजात घुसतो हा टोन! प्रेयसी हे गाणे म्हणले रेहमानने ७- ८ वेगवेगळ्या गायकांकडून गाऊन घेतले आणि शेवटी हरिहरन यांचा आवाज फायनल झाला. पण त्यामुळे आत्ता आपण ऐकतो त्या गाण्यात प्रेयसी.. हा लांबलेला शब्द सुखविंदर सिंगचा आहे. तर शेटवच्या दोन ओळी – ‘मेरे पास मेरे पास है’ या स्वरुपकुमार राठौड यांच्या आवाजातील आहेत.
एकूणच हरिहरन यांनी गायलेल्या चित्रपट-गीतांमधील यादें(यादें), झौका हवा का (हम दिल दे चुके सनम), कितनी बातें(लक्ष्य), ही विरहगीते नेहमीच असर करून जातात. ‘चप्पा चप्पा चरखा चले’ हे ही विशाल भारद्वाज यांचा वेगळा टच असलेले एक विरहगीतच. बाकी विशाल भारद्वाज- हरीहन यांनी मिळूनही काही भन्नाट गाणी दिली आहेत जसे- ‘माचीस’ मधलेच ‘छोड आए हम वो गलिया.’, ‘चाची 420’ मधली ‘डो रे गा रे’ आणि ‘दौडा दौडा भागा भागा सा’ ही दोन धुमाकूळ गाणी, ‘हुतूतू’ मधले ‘छै छप्प छै ’ हे अनवट गाणे.. लाजवाब! ‘खामोशी’ मधले ‘बाहों के दर्मियान’ हे प्रेमगीत, तसेच ‘दिलवील-प्यारव्यार’ चित्रपटासाठी ‘ओ हन्सिनी’, ‘तुम बीन जाउ कहाँ’ ही मूळ किशोरदांची गाणीही हरीजींनी गायलेली गाणीही सुंदर आहेत.
ही झाली चित्रपट गीते. हरीजींचे खरे प्रेम तर गझलगायकीत दडले आहे. ‘गुरू’मधले ‘ए हैरते आशिकी’ मधून त्याची झलक आपल्याला मिळतेच, पण त्यांनी स्वत संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या ‘मयकदे बंद करे लाख ज़्‍ामानेवाले’.. ही अवघड चालीची, वेगळ्याच धाटणीची गज़्‍ाल ऐकावीच अशी. ‘काश’, ‘मरीझ-इश्क का..’, ‘दर्द के रिश्तें’ ‘शहर दर शहर’(या दोन गाण्यांमधे र्भुे खान यांनी जी हार्मोनियम वाजवली आहे, त्याला तोड नाही.. केवळ भारी!), ‘आधी रात गुजर गयी..’, ‘एहदे मस्ती है’ या गझला.. त्यातूनही ‘हाझीर’ आणि ‘हाझीर-2’ हे अल्बम फारच उत्तम. या दोन्ही आल्बम्स मधे हरिहरन यांना उस्ताद झाकीर हुसेन यांनी साथ केली आहे.. म्हणजे सोने पे सुहागा !
अजून एक असेच ‘सोने पे सुहागा’ म्हणावे असे कॉम्बिनेशन म्हणजे कलोनियल कझिन्स! ‘कृष्णा नीबे..’ ‘ओ हो काय झालं..’ ‘सा नि धा पा..’ अशा गाण्यांनी लेस्ली लुईस आणि हरिहरन या जोडीने भारतीय संगीतात एका वेगळ्याच संगीतप्रकाराची भर घातली आहे असे म्हणायला अजिबातच हरकत नाही.
हे ऐकाच..
हरिहरन यांच्या गाण्याचा खरा आनंद लुटायचा असेल तर तो प्रत्यक्ष मफलीत किंवा स्टेज वर गातानाच लुटता येतो. छ्र५ी चे गडी असल्याने त्यांची खरी गायकी स्टेज वरच खुलून येते. असे त्यांचे लाईव्हवाले अनेक व्हिडियोज यूट्यूब वर उपलब्ध आहेत. विशेष करून त्यांच्या गझलांच्या मफिली.. त्यात ते काही चित्रपट गीतेही गातात. पण अशा मफलींत ते चित्रपट-गीतांचा पूर्ण चेहरा मोहराच बदलून टाकतात! गजल अंगाने गायलेली ‘तुही रे’,‘चंदा रे चंदा रे’, ‘यादे..’ ही गाणी यूटय़ूब वर नक्की अनुभवावी अशीच आहेत. याशिवाय हरीजी आणि शंकर महादेवन स्टेज वर गातानाचे सुद्धा दोन-तीन व्हिडिओ उपलब्ध आहेत. दोघांनी स्टेजवर एकत्र येऊन आहिर भरव, यमन अशा रागांमधे साधारणपणे गप्पा मारल्या आहेत. जगजीत जींना श्रद्धांजली म्हणून गायलेले ‘सरकती जाए रुखसे नक़ाब- आहिस्ता आहिस्ता..’ सुद्धा आवर्जून ऐकण्यासारखे. एप्रिल 3.

====================================================

पावसाची एक गंमत अशी की, एकच पाऊस एखाद्याला प्रचंड आनंदी, तर दुसऱ्या एखाद्याला हळवा करू शकतो. कोणाला बेभान, बेफिकीर जगायला सांगतो, तर कोणाला खोल, विचारी बनवतो. मराठी गाण्यांमधला पाऊस हा अशा सगळ्या भावनांना स्पर्श करतो, तो हिंदीसारखा केवळ प्रेम आणि विरह या मुद्दय़ांपुरता मर्यादित राहत नाही. आता सुधीर मोघ्यांचे हेच गाणे बघा ना –
‘आला आला वारा संगे पावसाच्या धारा! पाठवणी करा, सया निघाल्या सासुरा’ असे वाचण्यात आलेय की या गाण्यात भाताच्या रोपांना सासरी निघालेल्या मुलीचे प्रतीक दिले गेले आहे. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की, भाताचे बीज जमिनीत जवळजवळ पेरतात आणि मग जोरात पाऊस चालू झाला की, तयार झालेली रोपे काढून ती दुसऱ्या ठिकाणी पेरतात. त्या रोपांचे नवीन ठिकाणी एक नवीन आयुष्य चालू होते आणि ती रोपे मग समृद्धी आणतात. त्याचप्रमाणे स्त्रीचे एक नवीन आयुष्यच सासरी गेल्यावर चालू होते. असे गाणे निघू शकेल का हिंदी सिनेमामधे?
बाळासाहेबांचेच अजून एक गाणे- ‘ये रे घना ये रे घना..’ आरती प्रभूंनी लिहिलेले.. त्यातला ‘नको नको म्हणताना’ या फ्रेजचा सुंदर वापर, बेभानपणाकडे नेणारा, मर्यादा झुगारायला लावणारा पाऊस.. न्हाउ घाल माझ्या मना.. क्या बात! प्रतीकांचा विषय निघालाच आहे, तर ‘भरून भरून आभाळ आलंय भरून भरून’ या श्रीधर फडके- शांता शेळके-अनुराधा पौडवाल यांच्या गाण्याचा उल्लेख करावाच लागेल. गरोदर स्त्रीला भरलेल्या आभाळाचे, सुवार्ता आणणाऱ्या त्या वातावरणाचे प्रतीक यात सुंदर पद्धतीने वापरले आहे.
रात्री पाऊस पडत असला की ‘कुणी जाल का सांगाल का?’ हे यशवंत देव- कवी अनिल -वसंतराव देशपांडे यांचे गाणे आठवल्यावाचून राहत नाही. ‘आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली, परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली..’ कवी अनिल हे कधी तरी कुमार गंधर्व यांच्या घरी गेले असताना एक रात्री बाहेर जोराचा पाउस पडत होता आणि आत मुकुल शिवपुत्र गात बसले होते.. अशा उत्कट क्षणी कवी अनिल यांना ही कविता सुचली असे ऐकिवात आहे.
‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादात होता..’ या कवितेचा प्रत्येकाला वेगळा अर्थ लागतो. मला तो अजून लागला नाहीय, पण तरीही मंत्रमुग्ध होऊन हे गाणे ऐकतच राहावे असे वाटते. मग ते ‘भावसरगम’ किवा तत्सम मैफलीमधले बाळासाहेबांचे ‘’्र५ी’ रेकॉर्डिग असेल, तर विचारायलाच नको. पाऊस आणि निसर्ग त्या ओघाने आणि प्रेम यांमधला संबंध दाखवणारी सुंदर रोमँटिक गाणीही काही मराठीत कमी नाहीत. श्रावणात घननिळा बरसला, ऋतू हिरवा, ही गाणी मन प्रसन्न करून टाकतात.
..तुम्ही म्हणाल, की पाऊसगाण्यांची प्लेलिस्ट लिहायला एवढी घाई काय होती? जरा जोर धरू देत की पावसाला..! पण कसंय, पावसाचा एक प्रॉब्लेमसुद्धा आहे. पहिल्या-पहिल्यांदा मजा येते, पण मग काही वेळातच ‘पाऊस म्हणजे चिखल सारा, पाऊस म्हणजे सुटी उगाच!’वाली भावना जागृत होते! म्हणून म्हटले ती भावना यायच्या आधीच प्लेलिस्ट सादर करून टाकू या.

हे ऐकाच.. : ..त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो
‘गारवा’ हा अल्बम तसा सगळ्यांनी ऐकला असेलच, पण थोडासा विस्मृतीत गेलेला हा कॅसेट युगातला अल्बम कॅसेट थोडी झटकून पुन्हा ऐकायला हरकत नाही. सौमित्र (किशोर कदम) यांच्या सुंदर कविता, त्याचे सुंदर सादरीकरण, सुंदर चाली, मिलिंद इंगळेंचा मस्त आवाज, गिटारचा एवढय़ा प्रकर्षांने मराठीत झालेला पहिलाच वापर, उत्तम ध्वनी संयोजन यामुळे हा अल्बम कायमच माझ्या फेव्हरेटमध्ये राहील. तसेच संदीप-सलील जोडीची ‘तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊस ही..’ (अल्बम- नामंजूर) आणि विशेषत: ‘पाऊस असा रुणझुणता’ हे गाणे मला फारच आवडते. मस्त चाल, नोम-तोम बोलांचा (तराण्यात जे बोल असतात ते) कोरसमध्ये केलेला वापर, गाण्यात येणारा संदीपचा आवाज, त्या मागचे संगीत आणि एकूणच संगीत संयोजन यासाठी हे गाणे जर ऐकले नसेल तर न चुकता आवर्जून ऐका.

=======================

पावसाची एक गंमत अशी की, एकच पाऊस एखाद्याला प्रचंड आनंदी, तर दुसऱ्या एखाद्याला हळवा करू शकतो. कोणाला बेभान, बेफिकीर जगायला सांगतो, तर कोणाला खोल, विचारी बनवतो. मराठी गाण्यांमधला पाऊस हा अशा सगळ्या भावनांना स्पर्श करतो, तो हिंदीसारखा केवळ प्रेम आणि विरह या मुद्दय़ांपुरता मर्यादित राहत नाही. आता सुधीर मोघ्यांचे हेच गाणे बघा ना –
‘आला आला वारा संगे पावसाच्या धारा! पाठवणी करा, सया निघाल्या सासुरा’ असे वाचण्यात आलेय की या गाण्यात भाताच्या रोपांना सासरी निघालेल्या मुलीचे प्रतीक दिले गेले आहे. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की, भाताचे बीज जमिनीत जवळजवळ पेरतात आणि मग जोरात पाऊस चालू झाला की, तयार झालेली रोपे काढून ती दुसऱ्या ठिकाणी पेरतात. त्या रोपांचे नवीन ठिकाणी एक नवीन आयुष्य चालू होते आणि ती रोपे मग समृद्धी आणतात. त्याचप्रमाणे स्त्रीचे एक नवीन आयुष्यच सासरी गेल्यावर चालू होते. असे गाणे निघू शकेल का हिंदी सिनेमामधे?
बाळासाहेबांचेच अजून एक गाणे- ‘ये रे घना ये रे घना..’ आरती प्रभूंनी लिहिलेले.. त्यातला ‘नको नको म्हणताना’ या फ्रेजचा सुंदर वापर, बेभानपणाकडे नेणारा, मर्यादा झुगारायला लावणारा पाऊस.. न्हाउ घाल माझ्या मना.. क्या बात! प्रतीकांचा विषय निघालाच आहे, तर ‘भरून भरून आभाळ आलंय भरून भरून’ या श्रीधर फडके- शांता शेळके-अनुराधा पौडवाल यांच्या गाण्याचा उल्लेख करावाच लागेल. गरोदर स्त्रीला भरलेल्या आभाळाचे, सुवार्ता आणणाऱ्या त्या वातावरणाचे प्रतीक यात सुंदर पद्धतीने वापरले आहे.
रात्री पाऊस पडत असला की ‘कुणी जाल का सांगाल का?’ हे यशवंत देव- कवी अनिल -वसंतराव देशपांडे यांचे गाणे आठवल्यावाचून राहत नाही. ‘आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली, परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली..’ कवी अनिल हे कधी तरी कुमार गंधर्व यांच्या घरी गेले असताना एक रात्री बाहेर जोराचा पाउस पडत होता आणि आत मुकुल शिवपुत्र गात बसले होते.. अशा उत्कट क्षणी कवी अनिल यांना ही कविता सुचली असे ऐकिवात आहे.
‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादात होता..’ या कवितेचा प्रत्येकाला वेगळा अर्थ लागतो. मला तो अजून लागला नाहीय, पण तरीही मंत्रमुग्ध होऊन हे गाणे ऐकतच राहावे असे वाटते. मग ते ‘भावसरगम’ किवा तत्सम मैफलीमधले बाळासाहेबांचे ‘’्र५ी’ रेकॉर्डिग असेल, तर विचारायलाच नको. पाऊस आणि निसर्ग त्या ओघाने आणि प्रेम यांमधला संबंध दाखवणारी सुंदर रोमँटिक गाणीही काही मराठीत कमी नाहीत. श्रावणात घननिळा बरसला, ऋतू हिरवा, ही गाणी मन प्रसन्न करून टाकतात.
..तुम्ही म्हणाल, की पाऊसगाण्यांची प्लेलिस्ट लिहायला एवढी घाई काय होती? जरा जोर धरू देत की पावसाला..! पण कसंय, पावसाचा एक प्रॉब्लेमसुद्धा आहे. पहिल्या-पहिल्यांदा मजा येते, पण मग काही वेळातच ‘पाऊस म्हणजे चिखल सारा, पाऊस म्हणजे सुटी उगाच!’वाली भावना जागृत होते! म्हणून म्हटले ती भावना यायच्या आधीच प्लेलिस्ट सादर करून टाकू या.

हे ऐकाच.. : ..त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो
‘गारवा’ हा अल्बम तसा सगळ्यांनी ऐकला असेलच, पण थोडासा विस्मृतीत गेलेला हा कॅसेट युगातला अल्बम कॅसेट थोडी झटकून पुन्हा ऐकायला हरकत नाही. सौमित्र (किशोर कदम) यांच्या सुंदर कविता, त्याचे सुंदर सादरीकरण, सुंदर चाली, मिलिंद इंगळेंचा मस्त आवाज, गिटारचा एवढय़ा प्रकर्षांने मराठीत झालेला पहिलाच वापर, उत्तम ध्वनी संयोजन यामुळे हा अल्बम कायमच माझ्या फेव्हरेटमध्ये राहील. तसेच संदीप-सलील जोडीची ‘तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊस ही..’ (अल्बम- नामंजूर) आणि विशेषत: ‘पाऊस असा रुणझुणता’ हे गाणे मला फारच आवडते. मस्त चाल, नोम-तोम बोलांचा (तराण्यात जे बोल असतात ते) कोरसमध्ये केलेला वापर, गाण्यात येणारा संदीपचा आवाज, त्या मागचे संगीत आणि एकूणच संगीत संयोजन यासाठी हे गाणे जर ऐकले नसेल तर न चुकता आवर्जून ऐका.

===========================

मे महिना म्हणजे भयंकर उकाडय़ाचा आणि त्यामुळे कोल्ड िड्रक्सचा खप भयंकर वाढवणारा महिना. या कोल्ड िड्रकच्या एका साधारण आकाराच्या बाटलीत म्हणे तब्बल पाच-सात चमचे साखर असते. या शीतपेयांच्या कारखान्यांमुळे भूजल पातळीसुद्धा कमी होतेय म्हणे. थोडक्यात बघायचे झाले तर याचे तोटेच जास्त! एक कोल्ड िड्रक मात्र असे आहे, ज्यामुळे जागतिक संगीताला खूप फायदा झाला आहे. ते म्हणजे ‘कोक’! फ्युजन हा मूळ गाभा ठेवून जगातल्या विविध क्षेत्रांमधील, विविध प्रकारचे, ढंगांचे संगीत एकाच व्यासपीठावर आणून ‘कोक स्टुडिओ’ या क्रांतिकारक कार्यक्रमाने वर्ल्ड म्यूझिकमध्ये कमालीची भर घातली आहे. भारतात एम टीव्हीवर प्रदíशत होणारा हा कार्यक्रम पहिल्या सत्रात (सीझन १) श्रोत्यांच्या पसंतीला तितकासा उतरला नाही. दुसऱ्या सीझनमध्ये मात्र त्याने धुमाकूळ घातला. २०११ मध्ये भारतात या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यापूर्वी हा कार्यक्रम पाकिस्तान आणि त्याहीआधी मध्य-पूर्व आशिया आणि आफ्रिकेत सुरू झाला होता. आजच्या प्ले लिस्टमध्ये कोक स्टुडिओच्या मध्य-पूर्व आशिया आणि आफ्रिकेतील काही निवडक नमुनेदाखल परफॉर्मन्सेसबद्दल गप्पा.
हे व्हिडीओ यू टय़ूबवर तर आहेतच आणि कोक स्टुडिओ आपल्या वेबसाइटवर ते डाउनलोिडगसाठी उपलब्धही करीत असते. आफ्रिका आणि अरब संगीत हे भारतीय किंवा पाश्चिमात्य संगीताएवढे श्रीमंत नसले तरी त्यात वेगळेपण नक्कीच आहे. माझ्या मते तिकडे संगीताचा प्रवास हा लोकगीत, शास्त्रीय संगीत- उपाशास्त्रीय संगीत – भावगीत, पॉप, सिनेगीत असा न होता थेट लोकगीत ते पॉप असा झाला असावा. त्यामुळे तिकडचे संगीत हे जास्त नसर्गिक, कच्चे असे आहे. त्यात वेगवेगळ्या, आकर्षक, सुंदर आवाज असणाऱ्या तंतुवाद्यांचा आणि तालवाद्यांचा भरपूर वापर दिसतो. तिथल्या गायकीची पद्धतही निराळी.. गाऊन बघायला गेलो तर गल्याला गाठच पडेल अशी. चालींमध्ये फार वैविध्य नसले तरी अशा इतर गोष्टींमुळे हे संगीत मजेशीर बनते. त्यातून आसपासच्या इतर संगीतकारांनी हातभार लावला, तर सोने पे सुहागा!
काही उदाहरणे- मोहम्मद हमाकी हा इजिप्तचा प्रसिद्ध पॉप सिंगर. याने सॅण्डल या टर्कीच्या गायकाबरोबर केलेले we eftakart हे गाणे- पियानोबरोबर स्ट्रिंग्सचा लोभसवाणा वापर आणि वेगळ्या पद्धतीचे तालवाद्य.
याच हमाकीने ब्रिटनच्या jay sean या प्रसिद्ध हिपहॉप आर्टस्टिसोबत केलेले ‘मुस्तफा मुस्तफा’ हे गाणेसुद्धा मस्त आहे. त्यात ब्रासचा केलेला वापर आणि jay sean ने केलेले जलदगतीतले रॅप मजेदार आहे.Jay sean ने आपल्या ‘डाउन’चे एका वेगळ्याच प्रकारच्या गाण्यात रूपांतर केले आहे. ते shamma hamdan या अरबी गायिकेला बरोबर घेऊन. वर उल्लेख केलेल्या जिप्सी ब्रास बॅण्डचे अजून एक digui digui ya rababa हे गाणेही मजेशीर आहे. जिप्सी गिटारवादन करणारा गायक jose galves ने nancy ajram या अरेबियन गायिकेबरोबर केलेल्या hali hal या आणखी एका गाण्यातही ब्रासचा उत्तम वापर दिसतो.
अरेबियन तंतुवादकांचा, गायकांचा आणि दरबुका सारख्या तालवाद्यांचा एक संच Chehade Brothers नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचे कोक स्टुडिओ कार्यक्रमातले -fok el nakhel हे गाणे फारच धुमाकूळ घालणारे आहे. असाच धुमाकूळ घातलाय फ्लोरिडा हय़ा जगप्रसिद्ध हिप हॉपवाल्याने.. लेबनीज गायिका myriam fares बरोबर ‘वाइल्ड वन्स’ हय़ा गाण्यात. कधी कधी काहीसे एकसुरी वाटणारे अमेरिकन हिपहॉप अरेबियन थाटात आल्याने मात्र एकदम वेगळे वाटते.
असेच एकसुरी वाटणारे आफ्रिकन डॅन्स म्युझिकसुद्धा कोक स्टुडिओमध्ये नावीन्य घेऊन येते. उदाहरणार्थ- divine sorrow हे आफ्रिकेमधल्या प्रमुख देशातल्या पॉप स्टार्सनी एकत्र येऊन एड्सला आव्हान देण्यासाठी केलेले गाणे. शांततेत सुरू होणारे हे गाणे एकदम कधी आपल्याला डॅन्सकडे घेऊन जाते हे आपल्यालाच कळत नाही. Teddy afro च्या togetherness बद्दलही असेच म्हणता येईल. यातले रॅपसुद्धा बऱ्यापैकी कळते, कंटाळवाणे वाटत नाही. जेवढे कळले त्यावरून हा रॅपर एकीविषयी बोलतो आहे. कोक स्टुडिओने हेच तर घडवून आणले आहे – ‘एकी’.

हे ऐकाच..
आफ्रिकन, अरेबियन आणि कुठली कुठली भाषा असल्याने हय़ातल्या काव्याकडे (इंग्लिश सोडल्यास) लक्ष जाण्याची वेळच येत नाही, एका गाण्यात मात्र लक्ष जाते, कारण हय़ात टर्कीबरोबर पाकिस्तानी भाषा म्हणजेच उर्दू-हिंदी आहे. ‘इश्क़ किनारा’ असे हय़ा गाण्याचे नाव आहे. हय़ात वाजवली गेलेली दोन तंतुवाद्ये फार कमालीची गोड आहेत. एक पíशयन संतूर असावे, दुसरे तर दिसायलाच एवढे भन्नाट सुंदर आहे, वाजायलाही तितकेच सुंदर. बाकी गाणे तसे ठीकठाकच आहे, पण या दोन वाद्यांनी आणि वादकांनी या गाण्याचे सोने केले आहे. नक्की ऐका.

======

गेले साधारण दहा महिने मी इथे दर आठवडय़ाला एक प्ले लिस्ट घेऊन येतोय. मी जे ऐकतो, किंवा लहानपणापासून जे ऐकत आलो आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. लहानपणापासूनच सतत वेगवेगळे, अनेक प्रकारचे संगीत ऐकायचा माझा प्रयत्न राहिला आहे. पण गेल्या दोन वर्षांमध्ये मी सर्वात जास्त काही ऐकले असेल, तर ते म्हणजे आजची प्ले लिस्ट आहे.

मला दोन वर्षांची मुलगी आहे. ती झाल्यापासून आजवर, तिचा मूड सुधारण्यासाठी, ती रडत असेल तर तिला शांत करण्यासाठी, तिला झोपवताना, किंवा असंच, तिच्या कानावर लहानपणापासूनच सांगीतिक संस्कार घडावेत म्हणून; आमच्याकडे रोज जी गाणी वाजत आली आहेत, ती आजच्या प्ले लिस्टमधून तुमच्यासमोर आणतोय. तसंही १४ नोव्हेंबर हा बालदिन आहे. तर सादर आहे बाल- प्ले लिस्ट.
तिचा बिघडलेला मूड जर ठीक करायचा असेल, तर ‘तारे जमीन पर’मधले ‘बम बम भोले’ हा एक चांगला पर्याय आहे. संगीत संयोजन आणि शब्दांची रचनात्मक गर्दी या गाण्यात खूप छान पद्धतीने योजली आहे. शानचे गाणे आणि आमीर खानचा रॅप अजूनच मस्त. ‘मामाच्या गावाला जाऊ या’ हे गाणेसुद्धा अशावेळी नक्कीच मदत करते. हे गाणेसुद्धा धमाल आहे, पण हे गाणे ऐकताना मला बालपणापासून एक प्रश्न पडतो; मामाची बायको जर सुगरण आहे, तर मग ती रोज रोज पोळीबरोबर अगदी शेंबडय़ा पोरालाही बनवता येईल असा पदार्थ- ‘शिकरण’ का बरे करत असेल? असो, हे एक बडबड गीत आहे, हे विसरता कामा नये. लहान मुलांचा बिघडलेला मूड ठीक करण्याचे पुण्य अजून दोन बडबड गीतांना सतत मिळते. दोन्ही गुलजारसाहेबांच्या लेखणीतून अवतरलेली. एक म्हणजे हिंदीमधील सर्वश्रेष्ठ बडबड किंवा बालगीत म्हणायला हरकत नाही असे- ‘लकडी की काठी’! ‘घोडा था घमंडी, पोहोंचा सब्जी मंडी..’ अर्थबीर्थ बाजूला ठेवून केवळ शब्दांच्या ध्वनीवर लक्ष देऊन हे गाणे लिहिले आहे. दुसरे म्हणजे ‘जंगल बुक’ या कार्टूनचे हिंदी टायटल साँग- ‘जंगल जंगल बात चली है पता चला है, चड्डी पेहेन के फूल खिला है फूल खिला है’.. चड्डी पेहेन के फूल खिला! काय धम्माल संकल्पना शोधून काढलीय! हे गाणे ऐकताना मला माझ्या बालपणीची रविवार सकाळ तर आठवतेच, पण याचे शब्द आज ऐकताना अजूनच मजा येते. एक परिंदा था शरमिंदा, था वो नंगा.. इससे तो अंडे के अंदर था वो चंगा, सोच रहा है बाहर आखिर क्यों निकला है? केवळ भारी!
कलाकार भारी असेल तर तो कुठलीही कलाकृती भारीच करतो. मग ती लहानांसाठी असो, वा मोठय़ांसाठी. असाच अजून एक भारी कलाकार म्हणजे आपले खळे काका! ‘ससा तो ससा’ हे गाणे ऐकताना काय मजा येते आजही! पण गायला गेलो तर घाम फुटतो. मुळात लहान मुलांसाठीचे गाणे अशा अवघड चालीत बांधावेसे वाटणे हेच आश्चर्यकारक आहे. खळेकाकांनी नुसती अशी अवघड चाल बांधलीच नाही, तर ती अवघड असूनही प्रत्येकाच्या ओठी ती रुळेल अशी लक्षणीय बनवली. ‘नीज माझ्या नंदलाला’! शांत झोप आणणारी सुरेल अंगाई बनवणे म्हणजे ऐऱ्यागैऱ्याचे काम नोहे. येथे पाहिजे जातीचेच! याच जातकुळीची, दिग्गजांनी जातीने लक्ष घालून केलेली अजून काही गाणी म्हणजे- इलाही राजांचे ‘सुरमई अखियोंमे’ (हे आणि ‘नीज माझ्या..’ ऐकताना डोळ्यात पाणी का येते दर वेळेस. कोण जाणे?) येसुदासांचा प्रासादिक आवाज. क्या बात! ‘हायवे’मधले ‘सोहासाहासा’ आणि ‘स्वदेस’मधले ‘आहिस्ता आहिस्ता’. ‘स्वदेस’मधलेच ‘ये तारा वो तारा’ हे गाणेसुद्धा अंगाई नसूनही उदितजींच्या आणि बासरीच्या सुरेलपणामुळे आपला असर दाखवते. असेच, अंगाई नसूनही किंबहुना बालगीत नसूनही आपला असर करणारे, माझ्या मुलीला सर्वात आवडणारे गाणे म्हणजे ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटातले अमित त्रिवेदीने संगीतबद्ध केलेले व गायलेले ‘जियरा धाकधुक होय’. माझ्या मुलीचे नाव जियरा असल्याने तिला आम्ही हे गाणे ती अगदी काही दिवसांची असल्यापासून ऐकवतोय आणि आम्हालाही हे गाणे इतक्या वेळा ऐकूनही याचा कंटाळा येत नाही! वेगळीच जादू आहे या गाण्यात. मुलगीसुद्धा हे गाणे आणि वर नमूद केलेली सगळी गाणी अगदी मन लावून, चवीने ऐकत असते. तिच्या कानावर चांगले संस्कार होत आहेत याचे आम्हालाही समाधान वाटते.

हे ऐकाच.. डॉक्टर ऑफ म्युझिक
हा प्रकार आवर्जून ऐकायचा नाही, तर ऐकवायचा, प्रयोग करून पाहायचा प्रकार आहे. आमच्या मुलीला आम्ही अंगाई गीते ऐकवतोच, पण अनेकदा बदल म्हणून तिला झोपवताना तिला तानपुरासुद्धा ऐकवतो. तानपुऱ्याच्या अनेक कॅसेट्स, सीडीज बाजारात उपलब्ध आहेतच, फोनवरसुद्धा सुरेल तानपुऱ्याचे काही अ‍ॅप्स आहेत ज्यावर आपल्याला तानपुरा (तंबोरा) लावून ठेवता येतो. या तानपुऱ्याच्या आवाजामुळे मुलांना गोड हलकी गुंगी येते आणि ती शांत झोपतात असा आमचा अनुभव आहे. तुमच्या घरी लहान मूल असेल, तर हा प्रयोग नक्की करून बघा.

=========================

आजची प्ले लिस्ट एकदम सोप्पी. ही खरे तर मी बनवलेली नाही. आपोआप तयार झाली आहे. म्हणजे घरातून बाहेर पडायचं आणि पुढच्या दोन-तीन किलोमीटरच्या प्रवासातच आपल्या संस्कृतीचे एवढे विविध पलू ऐकायला, अनुभवायला मिळतात, की त्यातूनच एक प्ले लिस्ट तयार होत जाते. संगीत संस्कृतीचा अख्खा कॅनव्हासच डोळ्यासमोर तरळतो.
उदाहरणार्थ, गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया, प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया, देवा हो देवा गणपती देवा, काला कव्वा काट खाएगा, गणराज रंगी नाचतो, नाच मेरी बुलबुल के पसा मिलेगा, पसा फेक तमाशा देख, क्यूं पसा पसा करती है क्यूं पसे पे तू मरती है, अशी चिकमोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची गं, गल्ल्यान साखली सोन्याची ही पोरी कोणाची, बेबी डॉल मं सोने दी, ए जी ओ जी लोजी सुनो जी, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, क्या रंग रूप है क्या चाल ढाल है नया नया साल है नया नया माल है, गणपती आला नि नाचून गेला, माझा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, बोलो हमसे बढकर कौन, मं हूं डॉन मं हूं डॉन, एक चुम्मा तू मुझ को उधार दैदे और बदलेमें यूपी बिहार लले, पप्पी दे पप्पी दे पारूला, ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा तुज नमो तुज नमो तुज नामो, मांगो मांगो मांगो मांगो जो भी चाहो, आ आन्टे अमलापूरो, गं तुझा झगा गं झगा गं वाऱ्यावरती उडतो..
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा अष्टविनायका तुझा महिमा कसा.. गोल गोल चामडय़ाला दंडू.. पहिला गणपती.. मोरया गोसाव्यानं त्याचा घेतला वसा.. हाताला धरलंया म्हणते लगीन ठरलंया.. थेऊर गावचा चिंतामणी.. कहाणी त्याची ल ल जुनी.. हा भार सोसंना जड झालं पिका वानी.. गणपती गणपती गं चौथा गणपती.. चार बज गये लेकिन पार्टी अभी बाकी है.. हफ्ते में चार शनिवार होने चाहिए.. चार बौतल.. गना धाव रे मला पाव रे.. तूने मारी एँट्री यारे दिल में बजी घन्टी यारे टन टन टन.. लुंगी डॅन्स लुंगी डॅन्स लुंगी डॅन्स.. गणराज रंगी नाचतो नाचतो.. ले गयी दिल मेरा मनचली.. माउली माउली माउली माउली.. ही पोळीसाजूक तुपातली हिला म्हवऱ्याचा लागलाय नाद.. नाद करायचा नाय पाव्हणं नाद करायचा नाय.. पार्टी ऑल नाइट.. आंटी पुलिस बुला लेगी पर पार्टी यू ही चलेगी आज बौतला खुल्लन दो.. ते त्वा असुरपणे प्राशन केले.. दो घूंट मुझे भी पिला दे शराबी देख फिर होता है क्या.. परवा ही क्या उसका आरम्भ कैसा है और कैसा परिणाम है.. धरती अम्बर सितारे तेरी नज़्‍ारे उतारे.. देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा.. तू मेरा हिरो ओ ओ ओ हिरो ओ ओ ओ ए.. देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया.. तुनक तुनक तुन ता डा डा तुनक तुनक तुन.. तुन्दिल तनु परी चपळ साजिरी.. मेरा सोला का डोला छियालिस की छाती.. सिधी बात बोलू बात घुमानी नही आती.. आता माझी सटकली, मला राग येतोय.
मला राग येतोय. खरंच येतोय. पण, असो.. सांस्कृतिक देवाण-घेवाण, सांस्कृतिक जडण-घडण, सांस्कृतिक खिचडी का काय ते.. चालायचंच! पुढचे दहा दिवस.. नकोच वेगळी प्ले लिस्ट.
हे ऐकाच.. : शांत व्हा..
तुम्हालाही माझ्यासारखेच शांत व्हावेसे वाटत असेल, घरातून बाहेर पडू नये असे वाटत असेल, तर.. ‘विश्वविनायक’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. अजय अतुल जेव्हा अजय-अतुल नव्हते, तेव्हाचा त्यांचा (बहुधा पहिलाच) आल्बम. बाप आल्बम आहे हा. शंकर महादेवन यांनी गायलेले श्रीगणेशाय धीमहि, जे नंतर ‘विरुद्ध’ या चित्रपटात घेण्यात आले, एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी गायलेले प्रणम्य शिरसा देवं.., गणेश चालीसा, दमदार कोरसचा फार सुंदर वापर असलेले अथर्वशीर्ष आणि जय जय सुरवरपूजित आणि सर्वात भारी म्हणजे एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी गायलेली आरती! त्यात पुरुष आणि स्त्रियांचा कोरस वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेला. पुरुष आक्रमक आणि स्त्रिया अतिशय गोड आवाजात. फारच सुंदर. एकूण आल्बमचे संगीत संयोजन तर फारच वरचे. सिम्फनी आणि शास्त्रीय संगीताचा घडवून आलेला उत्तम मिलाप, स्ट्रिंग्स, ब्रासचा केलेला नावीन्यपूर्ण वापर. सगळं काही केवळ अप्रतिम. बहुतांश लोकांनी ऐकला असेलच, जर नसेल तर आवर्जून ऐका.

============================================

एकदा अमिताभ बच्चन कुठल्याशा भाषणात म्हणाले होते, की दोन गोष्टींमुळे भारत जगभर ओळखला जातो – एक म्हणजे ताजमहाल आणि दुसरी म्हणजे लता मंगेशकर! लता.. बस नाम ही काफी है..मेरी आवाज ही पहचान है. प्रस्तावानेत अजून काही लिहायची गरजच नाही.
दीदींची ब्लॅक अँड व्हाइट काळापासून आत्तापर्यंतची सर्वच हिंदी सिनेगीते अथवा मराठी भाव/भक्तिगीते तमाम रसिकांना तोंडपाठच असणार ह्य़ात काहीच शंका नाही. आणि त्यातली खूपशी गाणी वर्षभरातल्या अनेक प्लेलिस्ट्समध्ये येत असतातच. मी आजच्या प्लेलिस्ट मध्ये दीदींच्या फक्त तीन अल्बम्सचा विचार करत आहे.
एक – श्रद्धांजली. कुठलेही गाणे ऐकत असताना एक गायक म्हणून माझ्या मनात हा विचार चालू होतोच होतो, की हे गाणे मी कसे गायले असते? ही जागा अशी घेतली असती, हा शब्द असा उच्चारला असता वगैरे वगैरे. श्रद्धांजली हा अल्बम करण्यामागे अनेक उद्देशांबरोबर दीदींचा हाही एक उद्देश असावा असे मला वाटते. समकालीन आणि आधीच्या गायकांना श्रद्धांजली म्हणून दीदींनी हा अल्बम गायला. रफी साहेबांची ‘दिन ढल जाए हाए’, ‘मन रे तू काहे ना धीर धरे’, ‘कभी खुद पे कभी हालात पे’; किशोरदांची ‘कोई हमदम’, ‘ओ मेरे दिल के चैन’, ‘ये जीवन है’, ‘वो शाम’; ‘हेमंत कुमारची ‘ये नयन डरे डरे’, ‘तुम पुकार लो’; ‘सहगल साहेबांचे ‘मै क्या जानू क्या जादू है’ ही आणि अशी गाणी ऐकताना दीदींच्या मनातला या गायकांविषयीचा आदर तर दिसतोच, पण या गाण्यांचा त्यांनी लावलेला एक वेगळा अर्थही आपल्याला सापडतो. विशेषत: त्यांनी गायलेल्या मुकेशजींच्या गाण्यांमध्ये. कारण मुकेशजींनी प्रत्येक गाणे हे सरळसोट अत्यंत साध्या पद्धतीने गायले आहे, त्यात दीदींनी जाणीवपूर्वक आपल्या आवाजातले अलंकार कोरले आहेत आणि असे करताना गाण्याचा अनर्थ न होता त्यांचा अर्थ अजूनच चांगल्या पद्धतीने बाहेर येईल, याचे भान ठेवले आहे. उदाहरणार्थ ‘आंसू भरी है’, ‘कही दूर जब’, ‘जाऊं कहा बता ए दिल’.
दोन – मोठय़ा, महान कलाकारांचं आणि त्यांच्या कलकृतींचं हे एक वैशिष्टय़ असतं की, त्या कलाकृतींचा प्रत्येक काळात नवनवीन अर्थ समजत जातो आणि वेगवेगळ्या अभ्यासकाला वेगवेगळा अर्थ लागत जातो. गालिबसुद्धा प्रत्येकाला वेगळा वेगळा दिसला. बाळासाहेबांना तो जसा दिसला तो त्यांनी दीदींच्या आवाजातून आपल्यापर्यंत पोचवला. या चालींना अर्थातच बाळासाहेबांच्या (हृदयनाथ मंगेशकर) खास ‘दुर्गम’ स्वररचनांचा टच आहे. या अवघड गजला केवळ दीदीच गाऊ जाणोत. ‘कोई उम्मीद बर नहीं आती’ हे असेच अनवट चढम् उतार आणि अवघड जागांनी सजलेले गाणे. पण लतादीदींनी ते केवढय़ा सहजतेने गायले आहे! या अल्बममधले हे माझे सर्वात आवडते गाणे आहे. त्याचबरोबर बाज़्‍ाीचा-ए-अत्फमल है, नक्श फरियादी है किसकी, कभी नेकी भी उसके जी में गर, दहर में नकम््श-ए-वफम या गजलासुद्धा मी सतत ऐकत असतो.
तीन – मीरा. असाच अजून एक कलाकार ज्याच्याकडे पाहायचा दृष्टिकोन प्रत्येक वेळी नवीन असतो. बाळासाहेबांनी मीरेला आपल्या सुरांमध्ये गुंफताना पुन्हा एकदा दीदींना माध्यम बनवले आणि दीदींनी त्या मीरेला आपल्या सर्वाच्या अगदी जवळ, हृदयात आणून सोडले. प्रेम म्हणजेच भक्ती आणि प्रेम म्हणजेच ईश्वर हे मला या अल्बममुळे उमगले. प्रेमाची परिसीमा गाठणे म्हणजे काय हे मला या अल्बममुळे कळले. ‘चाला वाही देस’, ‘नंदनंदन दीठ पडम्ी या माई’, ‘म्हारा रे गिरिधर गोपाल’, ‘पपीहा रे’, ‘करम की गति न्यारी’, आणि सर्वात जास्त म्हणजे ‘माई माई कैसे जियु री’ (त्यातही दुसऱ्या माईची जागा) या भजनांच्या मी सदैव प्रेमात पडत असतो. बाळासाहेबांनी स्वरबद्ध केलेल्या मीरेला लतादीदींच्या आवाजात ऐकून आपणच काय, खुद्द तो कृष्णसुद्धा प्रेमात पडला असणार ह्य़ात मुळीच शंका नाही. दीदी, या मानवजातीच्या अंतापर्यंत आम्ही तुमच्यावर प्रेम करत राहू. आपणास ८६ व्या वाढदिवसाच्या (२८ सप्टेंबर) मनापासून शुभेच्छा!

हे ऐकाच.. : ये प्यार का नगमा है
जसे दीदींनी गायकांना श्रद्धांजली वाहिली आहे, तसेच अनेक जणांनी दीदींना त्यांची गाणी गाऊन सलाम केला आहे. श्रेयाला (घोषाल) तर प्रतिलता असे म्हटलेही जाते. पण मला यामधली सर्वात आवडलेली दोन सादरीकरणे- एक म्हणजे ॅकटअ अवॉर्ड्समध्ये दीदींना लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड जाहीर होताना उत्तम सिंग, सलीम सुलेमान, लेस्ली लुइस आणि सुंदर अशा नव्या पद्धतीच्या कोरसबरोबर शंकर महादेव यांनी गायलेले ‘ये प्यार का नगमा है’; जे लता दीदी स्वत: समोर बसून ऐकत आहेत. हे ऐकताना, पाहताना डोळ्यात पाणी तरळते. दुसरे म्हणजे ‘बाहो मे चले आ’ हे गाणे पाकिस्तानच्या उस्ताद इम्तियाज़ अली अणि उस्ताद रियाज़्‍ा अली यांनी गजलच्या अंगाने सादर केले होते. हे अफलातूनच आहे. गजल गायकीच्या बोल ताना, मुरक्या, अलंकार या गाण्यात ऐकताना एक वेगळीच मजा येते. हे दोन्ही व्हिडीयोज यू टय़ूबवर उपलब्ध आहेत. न चुकता पाहा.

=========================

नवरात्री. देवीचा उत्सव आणि त्या निमित्ताने स्त्री-शक्तीच्या सन्मानाचा उत्सव आणि म्हणूनच या आठवडय़ात सादर करत आहे काही गान-देवतांच्या, म्हणजे मला आवडणाऱ्या गायिकांच्या गाण्यांची प्लेलिस्ट. भारतातील गायिकांचा उल्लेख वरचेवर अनेक प्लेलिस्टमध्ये होतच असतो. आज काही पाश्चात्त्य संगीतातल्या देवतांचे स्मरण. या सर्वच देवता प्रतिभावान असण्याबरोबरच रूपवान जरी असल्या, तरी प्लेलिस्ट बनवताना त्यांच्या फक्त गान-प्रतिभेचेच दर्शन घेण्याचा (अटोकाट) प्रयत्न करण्यात आला आहे.


सुरुवात एला फिट्सगेराल्ड या क्लासिक जॅझ गायिकेच्या Misty या गाण्याने. साधी सोपी शब्दप्रधान गायकी. जुन्या काळात घेऊन जाणारी. मग व्हिटनी ह्य़ूस्टनचे ‘I will always love you’ हे अजरामर क्लासिक प्रेमगीत. पुढे सिलीयन डीऑन आणि मारिया कॅरी या दोन परफेक्शनिस्ट गायिका. सिलीयन डीऑनचे ‘टायटॅनिक’ चित्रपटातले ‘माय हार्ट विल गो ऑन’ हे जगप्रसिद्ध गाणे. तसेच Oh holy night हे सुंदर गाणे आणि मारिया कॅरी ची Hero आणि My all ं’’ ही दोन गाणी. तांत्रिक दृष्टय़ा शुद्ध स्वच्छ गायकी, लयीबरोबर जाणारी आवाजाची कंपने ((vibrato) आणि भावना पोहोचवण्याची उत्तम क्षमता यामुळे तुलनेने नवीन असल्या तरी या गायिका ‘क्लासिक’ या श्रेणीतच येतात.

आवाजाची कंपने म्हटल्यावर पाहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे शकीरा. मला वाटते स्पॅनिश लोकांच्या आवाजात जात्याच एक वेगळ्या प्रकारचा व्हायब्राटो असतो. त्याचा शकीरा फारच मस्त वापर करते. तसेच ओळीच्या अथवा शब्दाच्या शेवटी आवाज मुद्दाम थोडासा चिरकवण्याची तिची खास स्पॅनिश पद्धतसुद्धा वेगळी अशी आहे. तिच्या te aviso te anuncio आणि Gitana (या गाण्यात तबला वाजलेला ऐकून सुखद धक्का बसतो) या गाण्यांमधून ही शैली ठळकपणे समोर येते. आवाज मुद्दाम चिरकवण्याची अशीच लकब, थोडय़ा वेगळ्या पद्धतीने Dolores O’Riordan या आयरिश गायिकेने क्रॅनबेरीज बॅण्डच्या ‘झॉम्बी’ या गाण्यात वापरली आहे. माणसाच्या सतत युद्धस्थितीत असण्याच्या स्वभावावर टीका करणारे हे रॉक गाणे भन्नाट आहे. त्यात zombie हा शब्द उच्चारताना लावलेला वेगळा आवाज आणि त्या शब्दाची फोड करून शेवटचेच अक्षर पुन्हा पुन्हा गाण्याची पद्धत अद्भुत आहे. अशीच स्टाइल पुढे रिहाना या गायिकेनेसुद्धा आपल्या Umbrella गाण्यात केला आहे. ‘इन माय अम्ब रेला एला एला ए ए ए.. ’ अशी शब्दाची फोड करत रिहानाच्या खास हेल काढून गाण्याच्या पद्धतीमुळे हे गाणे ‘अलग’ झाले आहे. रिहानाचेच Stay हे गाणेसुद्धा मस्त, अलग आहे.

अशीच अजून एक अलग गायिका म्हणजे दियाना क्राल.. जॅझ संगीतच, पण नव्या पद्धतीची मांडणारी, नव्या दमाची गायकी. हिची Look of love आणि Quiet nights ही गाणी भारी आहेत. जॅझ संगीतात थोडेसे ‘कंट्री म्यूझिक’आणि सोल म्यूझिक वापरून आपल्या तलम, गोड आवाजात गाणी सादर करणाऱ्या नोराह् जोन्स या अमेरिकन गायिकेची Moon song आणि Don’t know why ही गाणी माझ्या फारच आवडीची आहेत. जॅझमधल्याच स्कॅटिंग या पद्धतीचा (म्हणजे आपल्याकडच्या नोम तोम किंवा आलापीमध्ये अर्थ नसलेल्या शब्दांचा गाताना वापर करतात तसे) वापर पॉप म्युझिकमध्ये करणारी भन्नाट गायिका म्हणजे अमेरिकेचीच बेयॉन्से नोवेल्स. स्कॅटिंग बरोबरच थोडेसे रॅप, रॉक, पॉप सर्वच काही एकत्र करून गाणारी मॉडर्न गायिका. हिची Deja vu आणि Heart of a broken girl ही गाणी मी सतत ऐकतो. अशीच एक मॉडर्न आणि तयारीची गायिका म्हणजे क्रिस्टिना अ‍ॅग्विलेरा. हिची The Voice within आणि Beutiful ही गाणी ऐकण्याजोगी आहेत.
अमेरिकेच्याच कॅटी पेरीचासुद्धा मी फॅन आहे. तिचे Wide awake हे सॉफ्ट गाणे आणि Rore हे धम्माल गाणे आहे. हिचा आवाज गोड आहे आणि दमदारही! Roar गाण्यात आवाजाच्या या दोन्ही बाजू दिसतात. या गाण्याचा व्हिडीयोसुद्धा धमाल आहे. दमदार आवाजाची, पण साध्या सोप्या गायकीची एक ब्रिटिश गायिका म्हणजे आजच्या काळात खूप प्रसिद्ध अशी अ‍ॅडल. हिची Rolling in the deep आणि जेम्स बाँडच्या चित्रपटासाठी गायलेले Skyfall ही गाणी छान आहेत. खऱ्या अर्थाने आजच्या काळातले गाणे कुठले असेल, तर Bang bang हे गाणे! अमेरिकेच्या अ‍ॅरिआना ग्रॅण्डे, इंग्लंडच्या जेसी जे आणि त्रिनिदादच्या निकी मिनाज या तिघींनी एकत्र येऊन केलेले हे फंक, पॉप, रॅप गाणे आधुनिक गायकी आणि उत्तम संगीत संयोजन याचा नमुना आहे. अ‍ॅरिआना आणि जेसी यांची जलद चढ-उतारांची, भुरळ पाडाणारी अशी गायकी आणि निकी मिनाजचे अति जलद, जगावेगळे रॅपिंग यामुळे हे गाणे आधुनिक काळातल्या सर्वोच्च गाण्यांपैकी एक ठरते. या देवतांच्या दर्शनाने तुम्हासही सुख मिळेल अशी आशा करतो.

हे ऐकाच.. ‘लाईव्ह’चा थरार
बेयोंसे ही गायिका स्टेजवर अजूनच भन्नाट गाते. तिने दे जावू हे गाणे लाइव्ह गाताना आधी भारी असे स्केटिंग केले आहे. यू टय़ूबवर उपलब्ध असलेला हा व्हिडीयो चुकवू नये असाच आहे. तसेच आपल्या लाइव्ह परफॉर्मन्ससाठी खास करून प्रसिद्ध अशा अजून काही देवता म्हणजे- अजीजा मुस्तफा जादेह ही अझरबैजान देशातली विदुषी तिच्या पियानोवादन आणि पियानो वाजवत गायनासाठी प्रसिद्ध आहे. ही गायकीसुद्धा वेगळी, काहीशी अरेबियन, काहीशी युरोपियन अशी आहे, जी स्केटिंगच्या जवळही जाते. हिचे Gadma gozal आणि Always हे परफॉर्मन्सेस चुकवू नयेत. Salute salon: सादरीकरणात व्यंग आणि विनोदाचा आगळावेगळा असा चार जणींचा ग्रुप (Chamber music qartet) ज्यात दोन व्हॉयलिन, एक चेलो आणि एक पियानोवादिका आहे. यांची Competetive foresome’ आणि पारंपरिक Levan pokkaही सादरीकरणे यू टय़ूबवर शोधून नक्की पाहावीत. The Corrs: एक व्हॉयलिन, एक बासरी आणि एक ड्रम वाजवणारी अशा तीन मुख्य स्त्रियांबरोबर काही पुरुष असलेला हा बँड त्यांच्या कंट्री स्टाइल म्युझिकसाठी प्रसिद्ध आहे. त्यांची ‘जॉय ऑफ लाइफ’ आणि ‘टायटॅनिक’मध्ये वापरले गेलले (ज्याची रिंगटोन तुम्ही कोणा ना कोणाच्या फोनवर नक्की ऐकली असेल) Toss the feathers हे सादरीकरण अज्जिबातच चुकवू नका.

=======================

२ मे रोजी आपल्या वसंतरावांचा – पंडित वसंतराव देशपांडे यांचा जन्मदिवस. मास्टर दीनानाथांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्राच्या गायकीचा चेहरामोहरा बदलून ती अजूनच समृद्ध करणारे, ‘वरण-भात-तुपाची गायकी’ हे महाराष्ट्रातील गायकांचे विशेषण खोडून काढणारे वसंतराव यांचे या पिढीतल्या कुठल्याही गायकावर संस्कार झाले नसतील तरच नवल!
‘मारवा’ गावा तो फक्त वसंतरावांनीच. वसंतरावांच्या मारव्यात अख्ख्या भारतातील निरनिराळ्या गायकींचा अभ्यास दिसतो. जे मारव्याचे, तेच ‘मालकंस’चे. किशोरी ताई, कुमाराजींच्या मालकंसपेक्षा खूप वेगळा, आक्रमक असा वसंतरावांचा मालकंस आहे. काहीसा उग्र. त्यांनी त्यामागचे कारणही एका मैफिलीत सांगितले आहे. ती मैफल यूटय़ूबवर उपलब्ध आहे. वसंतरावांचा एक ‘आहिर भैरव’ही यूटय़ूबवर आहे. वसंतरावांचे शास्त्रीय गायन तसे मी फक्त ‘यूटय़ूब’वरच पाहिले आहे. नाटय़गीते आणि इतर उपशास्त्रीय गाण्यांच्या मात्र माझ्याकडे इथून तिथून मिळवलेल्या काही कॅसेट्स आणि रेकॉर्डिग्ज आहेत. विशेषत: ‘कटय़ार काळजात घुसली’ची सगळीच गाणी. त्यातूनही माझे सर्वात आवडते – ‘या भवनातील गीत पुराणे’ हे गाणे वसंतरावांच्या मूळ स्वभावाशी आणि त्यांच्या विचारांशी मिळतेजुळते आहे असे मला वाटते. ‘कटय़ार..’मधली खानसाहेबांच्या ढंगाची ‘तेजोनिधि लोहगोल’, ‘घेई छंद मकरंद’, ‘सुरत पिया की’, आणि ‘लागी कलेजवाँ कटार..’ ही गाणीसुद्धा वेड लावून सोडणारीच. ‘कटय़ार..’ आल्यानंतर लोक तर वसंतरावांना ‘खाँसाहेब’ असेच संबोधू लागले. खूप पूर्वी मला रामकृष्ण करंबेळकर या माझ्या मित्राने (आजचा आघाडीचा तबला वादक.. याला दुर्मीळ रेकॉर्डिग्सचा संग्रह करण्याची प्रचंड आवड आहे.) खाँसाहेबांनी ‘लाइव्ह’ नाटकात गायलेले ‘सुरत पिया की’ दिले होते. खाँसाहेबांनी पहिल्या आलापयुक्त तानेतच पुढे या गाण्यात काय काय वाढून ठेवले आहे त्याचा सारांश दिला आहे. या गाण्यात (बंदिशीत) साधारण ५ राग आणि ३ ताल आहेत. वसंतरावांनी या रेकॉर्डिगमधल्या पहिल्या आलापातच हे पाचही राग समाविष्ट केले आहेत. केवळ अशक्य!
खाँसाहेबानी लाइव्ह गायलेले ‘मृगनयना रसिक मोहिनी’, मास्टर दीनानाथांचे ‘रवि मी.’ आणि ‘कर हा करी’ ही गाणीही मी सतत ऐकत असतो. खमाज’मधल्या- ‘मै कैसे आऊ ँ बालमा’ आणि कळस म्हणजे झाकीर भाई साथीला असलेली ‘सावरे ऐजैयो..जमुना किनारे मोरा गाव.’ स्वत: निष्णात तबलजी असल्याने झाकीर भाईंबरोबर त्यांनी या ठुमरीत जो ताल-लयीचा खेळ केलाय तो भन्नाट आहे.

हे ऐकाच.. रंगलेली गप्पांची मैफल
तो काळच कसला भन्नाट होता! वसंतराव, कुमारजी, अण्णा, पु. ल., सगळे एकत्र बसून मैफिली रंगवायचे, कधी कुमारजी गायला बसायचे, तर पु. ल. पेटीवर जायचे आणि वसंतराव तबला हातात घ्यायचे.. काय रंगत असेल अशी मैफल! अशा मैफिलींची रेकॉर्डिग्स उपलब्ध आहेत की नाही याबद्दल मला काही कल्पना नाही, परंतु पु. ल. आणि वसंतराव यांच्या गप्पांचे एक रेकॉर्डिग मात्र यूटय़ूबवर साधारण १४ मिनिटांच्या दोन भागांमध्ये उपलब्ध आहे. अत्यंत अनौपचारिक गप्पांमध्ये उलगडत जाणारा वसंतरावांचा जीवनपट, त्यांच्यावर होत गेलेले सांगीतिक संस्कार, त्यांचा संगीताबद्दलचा दृष्टिकोन; एक दोन प्रसंगी पु. ल. आणि वसंतराव यांच्यात सौम्य वादही झालेला आढळतो. वसंतरावांच्या तोंडून सहज आलेल्या काही बंदिशी, काही नाटय़गीते तर ऐकायला मिळतातच, शेवटी वसंतरावांचे सुंदर तबलावादनही ऐकायला मिळते! तेही पुलंच्या पेटीच्या साथीवर! वसंतरावांनी संगीत नाटकाच्या आणि नाटय़संगीताच्या आत्तापर्यंतच्या झालेल्या वाटचालीवर एक कार्यक्रम केला होता; तोसुद्धा यू टय़ूबवर उपलब्ध आहे. वसंतरावांचेच खास शैलीदार निवेदन आणि त्यांनी या वाटचालीचा आपल्या गायकीद्वारे घेतलेला मागोवा असलेला हा प्रकार यूटय़ूबवर किंवा कॅसेट-सीडी मिळाली तर आवर्जून अनुभवावा असाच!

ृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृ

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *